धनंजय मुंडेंसह दोघांवर दोषारोपपत्र

Foto

बीड- अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी येथील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते (रा.तळणी ता.अंबाजोगाई) या शेतकर्‍याची जमीन खरेदी करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकर्‍याला चाळीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. हा धनादेश न वटल्यामुळे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याचे संचालक वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणात तिघांना नोटिसा काढल्या आहेत.

 

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी मुंजा किसनराव गिते (रा. तळणी) यांची तीन हेक्टर १२ आर जमीन पुस येथे जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. तेव्हा गिते यांच्या मुलासह चौघांना साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याची हमी देण्यात आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रात कलम ४२०, ३४ मध्ये ४६५, ४६८, ४७१,४१९,अशी कलमे समाविष्ट करून २६ डिसेंबर २०१८ रोजी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी क्रं. यांच्याकडे दाखल केले आहे.

 

मुंजा किसनराव गिते यांची जमीन ५० लाखांत घेण्यात आली. जमिनीचे खरेदीखत जून २-१२ रोजी करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मीक बाबूराव कराड (पांगरी), सूर्यभान हनुमंतराव मुंडे (तळेगाव ता. परळी) यांच्या नावे करण्यात आले. शिवाय शेतकर्‍याचा मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकर्‍याला कारखान्याने प्रथम एक लाख व नंतर सात लाख ८१ हजार २५० रुपयांचा धनादेश दिला गेला.

 

कारखान्याचा खात्याचा परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावे असलेला ४० लाख रुपयांचा धनादेश शेतकर्‍याला दिला. तेव्हा गिते यांना मिळालेला धनादेश बँकेत न वटताच परत आला .या नंतर शेतकर्‍याने तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम मिळाली नाही. शेवटी गिते यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात २०१५ तक्रार देऊन एक महिना चकरा मारूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शेवटी गिते यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असता खंडपीठाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मीक कराड (पांगरी), सूर्यभान मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात कारवाई होत नसल्याने शेतकरी गिते यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने दोषारोपपत्र किती दिवसात दाखल केल जाईल अशी विचारणा केली तेंव्हा डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केले जाईल असे शासनातर्फे सांगण्यात आले होते.